कल्याण : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान, उपचार आणि कर्करोग विषयी जनजागृती करणे हा आहे.
या करीता आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून मिशन शक्ती अभियानाची सुरुवात दिनांक १५ ऑगस्ट पासून करण्यात आली. मिशन शक्ती अंतर्गत आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्र स्तरावरील आशा स्वयंसेविकांनी पालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन ४ लाखांहून अधिक महिलांचे प्रश्नावलीच्या साह्याने सर्वेक्षण करून संशयित लक्षणे असलेल्या ६३६५ महिला शोधण्यात आल्या. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभाग व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मधील झालेल्या कराराच्या अनुषंगाने आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी वसंत व्हॅली प्रसूती गृह कल्याण इथे २२५ संशयित महिलांची टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर व त्यांच्या टीम तर्फे पुढील तपासण्या करण्यात आली. यामध्ये मुखाच्या, स्तनाच्या, गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या तपासण्या व आवश्यकतेनुसार पॅप स्मियर, बायोप्सी घेण्यात आली. यापैकी ज्या महिलांमध्ये कर्करोग सदृश लक्षणे आढळतील त्यांना खारघर येथील टाटा रुग्णालयामध्ये प्रधान मंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत सेवा देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे कर्करोग तपासणी शिबीर सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
तरी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील ३० वर्षावरील सर्व महिलांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील तज्ज्ञांकडून आपली तपासणी मोफत करून घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
